16 डिसेंम्बर 2012 च्या रात्री निर्भया बलात्कार घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला.निर्घृणपणे बलात्कार करून खून करण्यात आलेल्या या घटनेविरोधात जागोजागी मोर्चे ,निषेध करण्यात आले .या घटनेचा निकाल लागत नाही तोपर्यंत कोपर्डी येथे 13 जुलै 2016 ला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केलेली घटना समोर आली.हैदराबाद येथे घडलेल्या बलात्कारी घटनेत आरोपींचे एन्काऊंटर करून बळी पडलेल्या स्त्री ला न्याय मिळवून देण्यासाठी एक पाऊल यंत्रणेने उचललं पण आजही आपल्या देशात बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. याच प्रमुख कारण म्हणजे गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती च राहिलेली नाही.न्यायालयात 20-30 वर्षे प्रलंबित राहिलेले खटले आपल्याला आपल्या देशात स्त्री किती सुरक्षित आहे याची साक्ष देतात.
यातूनच सुरू झाला तो म्हणजे स्त्री वरील बलात्कार आणि अत्याचाराचा दहशतवाद..!नुकतेच आंध्र च्या धर्तीवर मंजूर केलेले शक्ती विधेयक बलात्काराचा दहशतवाद रोखण्यासाठी एक ठोस पाऊल ठरते आहे . यामध्ये देण्यात येणाऱ्या मृत्यूदंड शिक्षेमुळे स्त्री वर होणाऱ्या अत्याचारी घटनांवर जबर वचक बसू शकतो ,पण स्त्री सुरक्षिततेसाठी फक्त कायदे करून उपयोगाचे ठरणार नाही तर या कायद्याची भीती समाजामध्ये निर्माण व्हायला हवी तरच माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अत्याचारी घटनामधून स्त्री सुरक्षित राहू शकते.
हुंडाबळी कायदा 1961,कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 या कायद्यानंतरही आजवर कित्येक स्त्रिया अत्याचारी छळाला कंटाळून स्वतःच्या जीवाला मुकल्या आहेत.न्यायालयीन व्यवस्था विधेयकापूर्वीही आपल्या देशात होतीच तरी स्त्री वर होणारा अत्याचार आजवर कोणताच कायदा थांबवू शकला नाही,याउलट राजस्थान मध्ये प्रत्येकी 24 तासात अत्याचाराचे 40 गुन्हे नोंदवले जातात तर बलात्काराच्या गुन्ह्यात तब्बल 37 टक्के पेक्षा जास्त वाढ झालेली आहे .इतकंच नाही ,तर न नोंदवलेले गुन्हे की जे उघडकीस ही येत नाहीत ते वेगळेच! स्त्री ला जर इतकीच भोगाची वस्तू समजली जाते त्या देशात एका कायद्याने स्त्री कशी काय सुरक्षित राहू शकते?
महिलांच्या सुरक्षिततेसाठी विधेयक ,सरकार,न्यायालयीन व्यवस्था फक्त हेच जबाबदार आहेत का ? जर खऱ्या अर्थाने स्त्री ला समाजात सन्मानाच स्थान द्यायचं असेल तर संपूर्ण समाजव्यवस्था ढवळुन निघायला हवी. पुरुषप्रधान संस्कृती आहे म्हणून स्त्री ला दुय्यम स्थान देने या विचारात जखडलेल्या समाजाला आधी मूल्य शिक्षनाचे धडे द्यायला हवेत .गार्गी ,मैत्रेयी,अहिल्याबाई होळकर,राजमाता जिजाऊ या ही स्त्रिया ज्यांनी स्वतःच्या कर्तृतत्वाने इतिहास कोरला हा इतिहास पाठीशी ठेवून आजच्या स्त्रियांनी ही स्वतःमधील क्षमता ओळखायला हव्यात .बऱ्याच दा अत्याचार होणाऱ्या महिला मानहानीला घाबरून आयुष्यभर हा छळ सहन करतात अन शेवटी आत्महत्या करून स्वतःला संपवून टाकतात,त्यामुळे नवे कायदे काटेकोर पणे अंमलात आणून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसवायचा असेल तर स्त्रियांनीही कोणाच्या अत्याचाराला न जुमानता या कायद्याची मदत घेऊन समाजात निर्भीडपणे वागायला हवं.तरच कायद्याची भीती समाजात निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने हे कायदे अमलात आणले जातील.
स्त्रियांवर होणारे बलात्कार हा एक प्रकारचा देशात तयार झालेला दहशतवादच आहे . स्वराज्यातल्या एका स्त्री वर बलात्कार केला म्हणून गुन्हेगाराचे दोन्ही हात पाय कापून त्याचा चौरंगी आकार बनवून भर चौकात ठेवून छत्रपतींनी बलात्काराविरोधी स्वराज्यात ही भीती निर्माण केली होती ,आज ही बलात्कार रोखण्यासाठी अन स्त्री ला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी याच प्रकारची भीती या शक्ती विधेयकाने करणे अपेक्षित आहे. बलात्काराच्या गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात येऊन या कायद्याची समाजात भीती निर्माण झाल्याशिवाय स्त्री सुरक्षिततेवर गत्यंतर नाही.
Comments
Post a Comment