Skip to main content

तूच तुझी वैरीण

                  आज दुपारी कॉलेज वरून येताना एका ठिकाणी द्राक्षे विकत घ्यायला थांबले. द्राक्षांचा दर उतरत येत असल्याने मी ही पाडून दरात द्राक्षे मागितली .द्राक्षे विकणारी व्यक्ती या एक वयस्कर आजीबाई होत्या .उन्हाची धाप लागून त्यांना चक्कर येत होती.मी माझ्या बॅगेतली पाण्याची बाटली काढून त्यांना दिली.भर उन्हात सहन होत नसतानाही हे काम का करताय असा सहानुभूती पूर्वक प्रश्न त्यांना मी केला . "बाई पोटासाठी झिजावं लागतंय" अस त्या उत्तरल्या. कष्ट केल्याशिवाय तर आयुष्याला पर्याय नाही ,रोजीरोटीसाठी काम करणं हाच संसाराचा राहाटगाडगा यामध्ये नवल नाही पण, "आजी इतकं वय झालेलं असताना ,शरीराला झेपत नसताना का राबताय?" म्हणून विचारलं त्यावर त्या म्हणाल्या "जगत आहे तोपर्यंत माणसाने कामात गुंतवून घेतलं पाहिजे ,आमचे मालक पोरग लहान असतानाच वारले ,एकट्या पोराला घेऊन आज इथवर आले ,इकडं तिकड काम करून त्याच शिक्षण अन लग्न करून दिल,त्याच्या जबाबदारी तुन निवांत झाले पण जगण्यासाठी दोन पैसे घरात आणले पाहिजेत,मी नाही कमवल तर सून घरात आयत देणार नाही .या वयात बाहेरची परवड होणार नाही ग,त्यापेक्षा बसून द्राक्ष विकली तर तेवढंच माझ्यासारख्या म्हातारीला दोन पैसे जास्त अन सुनेचे दोन शब्द कमी ऐकायला मिळतात." "आहो पन तुमचा मुलगा तरी तुम्हाला झेपत नसताना हे काम कस करून देतो?",त्या म्हणाल्या "घरखर्चाचा गाडा हाकताना त्याच्या नाकी नऊ येतात ,त्यात घरात ही माझ्यावरून सुनेमध्ये अन त्याच्यात किटकीट चालूच असते ,जास्त वाद नको म्हणून मी काम करून दोन पैसे नेते घरात,पुढचा संसार त्यांचाच आहे ,माझ तर नदीकाठी सरण भरायला चालू झाल,माझ्यामुळ सुनेची किरकिर अन त्यामुळं त्याच्या आयुष्याची राखरांगोळी नको इतकंच वाटत बघ!" मी त्या म्हणतील त्या दरात त्यांच्याकडून द्राक्ष घेतली अन घरी आले ,पण रात्री त्या आजींच्या विचाराने झोप लागेना . ज्या मुलाला जन्म दिला , आयुष्यभर ज्याच्यासाठी हाडाचे मनी अन रक्ताचं पाणी करून झिजल्या,आज घरात राहण्यासाठी त्याच्या बायकोला कमवून पैसे द्यावे लागत होते .खरंच म्हातारपण इतकं असह्य असत का ? नवरा गेल्यानंतर ज्या खंबीरपणे त्यांनी पोराला वाढवलं त्या पोराला ही आईची म्हातारपणी अशी परवड झालेली बघवतेच कशी? सुनेला घरात म्हाताऱ्या माणसाने आयते खाल्लेलं बघवेना पण चार दिवस सुनेच्या फेऱ्यात ती ही कधीतरी म्हातारी सासू होणारच की !याच जागी तिची आई असती तर ? या दोघीही स्त्रिया च ! पण किती विभिन्न पातळीवरच्या ! एकीने पुरुषानेच घरात कमवून आणायचं या विचाराला शह देऊन परिस्थिती समोर हतबल होऊन केवळ आपल्या पोटच्या मुलासाठी दुसऱ्याच्या घरी कामे करून त्याला शिकवलं तर दुसरीने दोन पैशासाठी शरीराला झेपत नसताना त्याच आईसमान सासूला दोन पैशासाठी उन्हात पाठवायला हयगय केली नाही .

                        पुराणातली सीता आणि हॅम्लेट ची आई या दोन विभिन्न स्त्रियांची प्रतिकृती या सून अन सासूच्या रुपात मला दिसत होती . एकवचनी ,एकपत्नी रामाने केवळ प्रजेचा राजा म्हणून सम्राज्ञी च्या जागी सीतेला बसवायचं असेल तर रावणाकडून जिंकून आल्यावर तिच्या पतिव्रतेची चाचणी घ्यायला हवी तर च ती सम्राज्ञी होण्यास योग्य अस म्हणून सीतेलाही नवऱ्याच्या कर्ताव्याखातर पतिव्रता सिद्ध करावी लागली,मागचा पुढचा विचार न करता ती तिने केली सुद्धा तर दुसरीकडे सत्तेच्या लालसेपोटी हापापलेल्या हॅम्लेट च्या आईने स्वतःच्या नवऱ्याला मारून टाकलं . किती हा विरोधाभास ! स्त्री जात एकच पण पुराणापासून आजपर्यंत उर्मिला,शर्मिष्ठा ,कैकेयी ,हॅम्लेटची आई,अन आजची स्त्री . परिस्थिती समोर सगळ्याच नतमस्तक ठरल्या. सीता असो नाहीतर हॅम्लेट ची आई ,पतिव्रतेसाठी कर्तव्यप्रिय पतीची मर्जी राखणे म्हणून इच्छा नसताना स्वतःच पतिव्रत्य सिद्ध करणे अन नवऱ्याच्या भावाच्या मदतीने सत्तेसाठी स्वतःच नवऱ्याचा खून करणे ,या ठरल्या पुराणातल्या अन पुस्तकातल्या गोष्टी ...पण आजच्या कलियुगात घराघरात चालणाऱ्या या गोष्टी म्हणजे सुनेने सासूला नावाला 'आई' हाक मारून तिच्या वयाचा ही मान न राखता उतारवयात तिची परवड करणे असो नाहीतर शिकलेली अन महत्वाकांक्षी सून घरात आणून तिच्या भवितव्याचा विचार न करता केवळ घराची अन वंशाची इब्रत राखण्यासाठी एक मूल होण्यास नवऱ्याला भरीस घालणे, तिच्या स्वप्नांचा विचार न करता घरकामात अन नवऱ्याच्या पाहुण्यांची उठबस करण्यातच जन्म घालवायला लावणारी सासू नणंद ...! याच स्त्री जातीला एकीकडे चळवळी अन आंदोलने करून समाजाला शह देणं शक्य झालं पण घरच्या परिस्थिती ला शह देताना तीच स्त्री जात तिला हतबल करायला समोर येऊन ठाकली हीच आजची वस्तुस्थिती !

-भक्ती पानसरे



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Taali

 Taali           खरंच कौतुक करावं वाटत , या series मधल्या प्रत्येक कलाकाराचं आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे गौरी सावंत यांची भूमिका केलेल्या सुश्मिता सेन चं ! आपल्यासमोर फक्त टाळ्या वाजवणारे आणि टोल नाक्यांवर ,रेल्वे मध्ये पैसे मागणारे म्हणून ज्यांची प्रतिमा तयार होते त्या व्यक्तीचे वैयक्तिक आयुष्य ,त्याला सोसावी लागणारी स्थित्यंतरे ...खरंच हृदय पिळवटून टाकणारी आहेत . स्त्री आणि पुरुष याच्या ही बाहेर एक नैसर्गिक जीवन आहे पण आपल्यात ते समाजमान्य नाही म्हणून जगण्याचा अधिकार च नाही का? यावरची बरीच उत्तरे 'गौरी सावंत' यांच्या प्रवासातून मिळतात . त्यांचा 'गणेश ते गौरी' हा प्रवास या समुदायाच्या जगण्याविषयी विचार करायला भाग पाडतो .       सिरीज मधले प्रसंग बघून आपल्या आजूबाजूला या घटना होत असतात ,आपण त्याकडे संवेदनशीलतेनेही बघायची तसदी घेत नाही ,त्या किती विक्षिप्त आहेत याची प्रचिती येते. या सिरीज मधला सगळ्यात जास्त टोचलेला प्रसंग तो म्हणजे, नर्गिस ची death आणि त्यानंतर फक्त dead body स्ट्रेचर वर ठेवण्यात यावी या मागणीला असंवेदनशील लोकांनी केलेला विरोध ! हे बघताना खर

थरार

                   नेहमीसारखाच आजही व्यायामशाळेतून यायला उशीर झाला होता .व्यायामशाळेत जाण्यासाठी आम्हाला रोज परळीचा घाट पार करून सातारला जावं लागतं ,अंतर तस फार नाही अकरा किलोमीटर आहे पण रस्ता मात्र घाटाचा अन डोंगररांगांनी वेढलेला ! रात्री अपरात्रीच्या वेळी मुलीनी इतका वेळ घराबाहेर थांबू नये म्हणून घरची मंडळी सतत ओरडतात, पण निशु ताई अन मी काही आमच्या व्यायामाच्या वेळेत हयगय करत नाही. आमच्या ठरलेल्या वेळेत च म्हणजे साडे नऊ च्या दरम्यान घरी येतो . आजही सगळा व्यायाम उरकून , आरशात बघत शरीरयष्टी चे भारदस्त फोटो काढले. फ्रेश होऊन गाडीला किक मारली अन घरी यायला निघालो. व्यायामाने थकलेल्या शरीराला खूप भूक लागली होती , घरी लवकर पोहोचून गरमागरम ताटावर ठाण मांडायला मिळावं म्हणून गाडीचा वेग मी वाढवला होता . सुनसान अशा त्या आडबाजूच्या घाट रस्त्याला गाड्यांची वर्दळ फार नव्हती पण अंधारलेल्या समयी रातकिड्यांच्या कीर्र आवाजात भीतीदायक माहोल तयार झाला होता .वाटेत लागणाऱ्या उरमोडीच्या पुलाशेजारीच गावची स्मशानभूमी आहे .त्या पुलावरून जाताना एका सालात एक तरी बळी 'ती' घेतेच अश