आज दुपारी कॉलेज वरून येताना एका ठिकाणी द्राक्षे विकत घ्यायला थांबले. द्राक्षांचा दर उतरत येत असल्याने मी ही पाडून दरात द्राक्षे मागितली .द्राक्षे विकणारी व्यक्ती या एक वयस्कर आजीबाई होत्या .उन्हाची धाप लागून त्यांना चक्कर येत होती.मी माझ्या बॅगेतली पाण्याची बाटली काढून त्यांना दिली.भर उन्हात सहन होत नसतानाही हे काम का करताय असा सहानुभूती पूर्वक प्रश्न त्यांना मी केला . "बाई पोटासाठी झिजावं लागतंय" अस त्या उत्तरल्या. कष्ट केल्याशिवाय तर आयुष्याला पर्याय नाही ,रोजीरोटीसाठी काम करणं हाच संसाराचा राहाटगाडगा यामध्ये नवल नाही पण, "आजी इतकं वय झालेलं असताना ,शरीराला झेपत नसताना का राबताय?" म्हणून विचारलं त्यावर त्या म्हणाल्या "जगत आहे तोपर्यंत माणसाने कामात गुंतवून घेतलं पाहिजे ,आमचे मालक पोरग लहान असतानाच वारले ,एकट्या पोराला घेऊन आज इथवर आले ,इकडं तिकड काम करून त्याच शिक्षण अन लग्न करून दिल,त्याच्या जबाबदारी तुन निवांत झाले पण जगण्यासाठी दोन पैसे घरात आणले पाहिजेत,मी नाही कमवल तर सून घरात आयत देणार नाही .या वयात बाहेरची परवड होणार नाही ग,त्यापेक्षा बसून द्राक्ष विकली तर तेवढंच माझ्यासारख्या म्हातारीला दोन पैसे जास्त अन सुनेचे दोन शब्द कमी ऐकायला मिळतात." "आहो पन तुमचा मुलगा तरी तुम्हाला झेपत नसताना हे काम कस करून देतो?",त्या म्हणाल्या "घरखर्चाचा गाडा हाकताना त्याच्या नाकी नऊ येतात ,त्यात घरात ही माझ्यावरून सुनेमध्ये अन त्याच्यात किटकीट चालूच असते ,जास्त वाद नको म्हणून मी काम करून दोन पैसे नेते घरात,पुढचा संसार त्यांचाच आहे ,माझ तर नदीकाठी सरण भरायला चालू झाल,माझ्यामुळ सुनेची किरकिर अन त्यामुळं त्याच्या आयुष्याची राखरांगोळी नको इतकंच वाटत बघ!" मी त्या म्हणतील त्या दरात त्यांच्याकडून द्राक्ष घेतली अन घरी आले ,पण रात्री त्या आजींच्या विचाराने झोप लागेना . ज्या मुलाला जन्म दिला , आयुष्यभर ज्याच्यासाठी हाडाचे मनी अन रक्ताचं पाणी करून झिजल्या,आज घरात राहण्यासाठी त्याच्या बायकोला कमवून पैसे द्यावे लागत होते .खरंच म्हातारपण इतकं असह्य असत का ? नवरा गेल्यानंतर ज्या खंबीरपणे त्यांनी पोराला वाढवलं त्या पोराला ही आईची म्हातारपणी अशी परवड झालेली बघवतेच कशी? सुनेला घरात म्हाताऱ्या माणसाने आयते खाल्लेलं बघवेना पण चार दिवस सुनेच्या फेऱ्यात ती ही कधीतरी म्हातारी सासू होणारच की !याच जागी तिची आई असती तर ? या दोघीही स्त्रिया च ! पण किती विभिन्न पातळीवरच्या ! एकीने पुरुषानेच घरात कमवून आणायचं या विचाराला शह देऊन परिस्थिती समोर हतबल होऊन केवळ आपल्या पोटच्या मुलासाठी दुसऱ्याच्या घरी कामे करून त्याला शिकवलं तर दुसरीने दोन पैशासाठी शरीराला झेपत नसताना त्याच आईसमान सासूला दोन पैशासाठी उन्हात पाठवायला हयगय केली नाही .
पुराणातली सीता आणि हॅम्लेट ची आई या दोन विभिन्न स्त्रियांची प्रतिकृती या सून अन सासूच्या रुपात मला दिसत होती . एकवचनी ,एकपत्नी रामाने केवळ प्रजेचा राजा म्हणून सम्राज्ञी च्या जागी सीतेला बसवायचं असेल तर रावणाकडून जिंकून आल्यावर तिच्या पतिव्रतेची चाचणी घ्यायला हवी तर च ती सम्राज्ञी होण्यास योग्य अस म्हणून सीतेलाही नवऱ्याच्या कर्ताव्याखातर पतिव्रता सिद्ध करावी लागली,मागचा पुढचा विचार न करता ती तिने केली सुद्धा तर दुसरीकडे सत्तेच्या लालसेपोटी हापापलेल्या हॅम्लेट च्या आईने स्वतःच्या नवऱ्याला मारून टाकलं . किती हा विरोधाभास ! स्त्री जात एकच पण पुराणापासून आजपर्यंत उर्मिला,शर्मिष्ठा ,कैकेयी ,हॅम्लेटची आई,अन आजची स्त्री . परिस्थिती समोर सगळ्याच नतमस्तक ठरल्या. सीता असो नाहीतर हॅम्लेट ची आई ,पतिव्रतेसाठी कर्तव्यप्रिय पतीची मर्जी राखणे म्हणून इच्छा नसताना स्वतःच पतिव्रत्य सिद्ध करणे अन नवऱ्याच्या भावाच्या मदतीने सत्तेसाठी स्वतःच नवऱ्याचा खून करणे ,या ठरल्या पुराणातल्या अन पुस्तकातल्या गोष्टी ...पण आजच्या कलियुगात घराघरात चालणाऱ्या या गोष्टी म्हणजे सुनेने सासूला नावाला 'आई' हाक मारून तिच्या वयाचा ही मान न राखता उतारवयात तिची परवड करणे असो नाहीतर शिकलेली अन महत्वाकांक्षी सून घरात आणून तिच्या भवितव्याचा विचार न करता केवळ घराची अन वंशाची इब्रत राखण्यासाठी एक मूल होण्यास नवऱ्याला भरीस घालणे, तिच्या स्वप्नांचा विचार न करता घरकामात अन नवऱ्याच्या पाहुण्यांची उठबस करण्यातच जन्म घालवायला लावणारी सासू नणंद ...! याच स्त्री जातीला एकीकडे चळवळी अन आंदोलने करून समाजाला शह देणं शक्य झालं पण घरच्या परिस्थिती ला शह देताना तीच स्त्री जात तिला हतबल करायला समोर येऊन ठाकली हीच आजची वस्तुस्थिती !-भक्ती पानसरे
हृदयस्पर्शी 👌👌👌👌
ReplyDeleteNice
ReplyDelete