अंधारलेली काळरात्र... सन्नाटा करणारा आवाज... गर्द झाडीतून ...रस्त्यावरून दमकणार्या काजव्यांचं लुकलुकणारं ते रूप... निरभ्र आकाशात शापित चांदण्यांचं राज्य, सूर्याचं साम्राज्य अस्त पावलं म्हणून जणू काही राजा चांदोबाच्या महालात वर्चस्व दाखवणाऱ्या दीड-दमडीच्या 'या' कुशलतेने पृथ्वीवर देखरेखच ठेवत होत्या ... असा हा सगळा प्रसंग असताना ,मी मात्र एक कवी ...काय बरं प्रासंगिक कविता करणार या सगळ्यावर ?ऐन तारुण्यात बहरलेल्या यौवणावर प्रणयकाळाच्या कविता खरतर सुचायला हव्या होत्या, पण माझ्या मनात एक भलतीच हुरहुर लागलेली लागलेली होती.निरभ्र आकाशातल्या या चांदण्या पाहून खरंतर प्रेम कविता करण्याचा मोह आज पर्यंत मला कधीच आवरला नाही पण आज... आज माझी मजल यांना शापीत म्हणण्यापर्यंत पोहोचली होती. न राहवता मीच या सर्व विचारातून सुटका मिळवण्यासाठी एक फेरफटका मारून यावं यावं म्हटलं.गस्त घालणाऱ्यांखेरीज आता या घडीला कोण बरं भेटेल ?रात्रीचे सुमारे बारा वाजून गेले होते, "बागुलबुवा येईल हं! बाहेर अजिबात डोकवायचं ही नाही" यावरून विश्वास उडण्यापुरतं आणि त्याही पलीकडे जाऊन मतदानाचा हक्क बजावण्याएवढं वय माझं झालेलं होतं. या विचार मुक्तीसाठी मी डायरी आणि लेखणी घरीच ठेवून आले आले ठेवून आले होते पण प्रतिभावंत कवीच्या बुद्धीला त्याची प्रतिभा कधीच बाजूला काढून ठेवता येत नाही हे ही तितकंच खरं!
एकांत हवा म्हणून गावातल्या टिळकांच्या पुतळ्यापाशी येऊन बसले.खरंतर बसले होते एकांत हवा म्हणून पण डोक्यातल्या विचाराच्या भुंग्यांनी मात्र बंडच पुकारले होते.डोळे मिटून शांत बसून राहिले या विचारांशी संग्रामवीरासारखी वैचारिक रणांगणावर झुंज देत,पण या वैचारिक भुंग्याने ज्यासाठी बंड पुकारले होते त्या मागण्या माझ्या शस्त्रापेक्षाही कितीतरी पटीने ताकदवान होत्या. माझी ताकत अपुरी पडत होती हे मला जाणवत होतं पण ही लढाई... लढावी तर मला एकटीलाच लागणार होती.
तितक्यात ...माझ्या खांद्यावर पाठीमागून कुणीतरी हात ठेवल्यासारखा भास मला झाला.मागे वळून पाहिलं मी पण, अंधारात फक्त अस्पष्ट प्रतिकृती दिसत होती डोक्यावर पगडी ,अंगावर सफेद रंगाचा सदरा असा साधारणता पेहराव होता. माझं नाव देखील विचारलं त्यांनी ,त्याच वेळी मला दिसत असलेल्या प्रतिकृतीच्या आवाजातला कणखरपणा मी ताडला होता. पण ,अजूनही त्या स्पष्ट प्रतिकृतीच्या वैचारिक कणखरतेशी आणि निश्चयात्मक मुत्सद्देपणाशी मी अज्ञातच होते. ही व्यक्ती कोण बरं असावी असावी? कुतुहलता तर होतीच म्हणून क्षणाचाही विलंब न करता मी त्यांना विचारलं,"बाबा कोण आहात तुम्ही? आणि इतक्या रात्री इथे काय करताय?"तेवढ्यात ती प्रतिकृती उत्तरली ..."बाळा मी इथेच वास्तव्य करतो ,नवीन आलीये ती ही पिढी नवीन आलेले आहेत ते हे, या पिढीचे विचार!एवढ्या कोड्यात बोललेलं मला काही समजलच नाही ;पण नंतर कळलं , की हा कोणीतरी ज्ञानी मनुष्य असणार.या बाबाच्या ज्ञानाचं तेज त्याच्या डोळ्यातून झळकत होतं.अजून माहिती काढण्यासाठी मी कुतुहलतेने पुढे सरसावले, "तुम्ही इथे कधीपासून आहात?मी तुम्हाला याआधी कधीही पाहिले नाही!"त्यावर मला उपदेश करत ते म्हणाले...
"अरे वेड्या बाळा माझं वास्तव्य विचारात आहे, ग्रंथात झाकून बघ माझ्या अस्तित्वाचं वैचारिक दर्शन घडेल तुला ,स्वातंत्र्याचा इतिहास चाळून बघ माझ्या निश्चयाचं दर्शन घडेल तुला; पण सखेदाश्चर्याने खंत वाटते की या पिढीला,या नवजात तरुणांना हल्ली या सगळ्याचं दर्शन होतच नाही. काळाप्रमाणे बदल हवा हे मानतो मी पण बदलाला ही लाजवेल अशी वर्तणूक बघताना माझ्या सहकाऱ्यांच्या बलिदानाचं हेच का सामर्थ्य ?असा प्रश्न मला पडतो.ज्या तरुणाईने सळसळत्या रक्ता सोबत सळसळती कामगिरी केली पाहिजे ती तरुणाई आज नशेच्या झरोक्यात झुरत बसलीये .ज्या तरुणाईत स्वातंत्र्योत्तर भारताचं भविष्य मी पाहत होतो ,ती तरुणाई नाहक पाश्चात्य संस्कृतीचं अवलोकन करतेय. स्वदेशीचा जो अट्टाहास मी मांडला होता तो याकरिताच का?आजकालच्या सामाजिक भान नसलेल्या तरुण मुलींची बेलगाम वर्तणूक बघताना तर असं वाटतं सावित्रीने यांना शिक्षणाची दारे उघडून दिली खरी पण, 'संस्कारक्षम शिक्षणाचे कवाडे' उघडायचे राहूनच गेले. जन्म नोकरी-व्यवसाय लग्न पोर बाळ म्हातारपण नातवंड सुख मृत्यू एवढ्यात गर्तेत अडकलेल्या हे आजच जीवन!यामध्ये राष्ट्र सुखाचा लवलेश देखील नाही.अंधश्रद्धा सनातनगिरी कमी झाली खरी पण अंधश्रद्धा,भोंदूगिरी अन संस्कार यामधला फरकच या पिढीला समजला नाही.संतांची काव्ये या मोबाईलच्या जमान्यात कित्येक कोस मागे पडून राहिली.एकनाथांची भारुड,तुकारामांच्या गाथा,समर्थांचा दासबोध या पिढीनं कधी हाताळला देखील नाहीये.म्हातारपणी अध्यात्माचे खूळ येते खरे,पण म्हणून मनाचे श्लोक घोकून म्हातारपण घालवायचे का?हल्लीची शरीरसुखाकडे धावणारी वासनांध पिढी म्हातारपणी दासबोध वाचेल खरी पण व्यक्तिसुखापेक्षा राष्ट्रसुखाचे महत्व पराकोटीचे आहे ,हा समर्थांचा उपदेश समजला तरी वेळ निघून गेलेली असेल. शिवजयंती दिवशी मशाली घेऊन पळताना ,छत्रपती शिवाजी महारांबद्दलची कृतज्ञता अन श्रद्धा जरी खरी असली तरी....परस्त्रीकडे पाहताना स्त्री ला मातेसमान आदर हा लवलेश तरी मनाला स्पर्शतो का?सावरकरांविषयी तऱ्हेतऱ्हेने निष्ठा व्यक्त करताना,त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी नंतर आज उपभोगत असलेल्या स्वातंत्र्याचे महत्व कोणीही जाणत नाही.जर या पिढीला देशासाठीच बलिदान कळलं,मग ते रणांगणात येवो अथवा तुरुंगात येवो...शहिदांच्या बलिदानाचं सामर्थ्य देखील भारतात तेव्हाच जागृत होईल
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"अशाच प्रकारचे त्या प्रतिकृतीचे उपदेश मला वाटत होते.आता माझ्या डोक्यात उठलेले बंड त्यांच्या या उपदेशानेच शांत झालेले होते. माझ्या मनात त्या थोर पुरुषाला नतमस्तक होण्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच विचारांचा लवलेशदेखील नव्हता. कृतज्ञतेपूर्वक मी त्यांच्या चरणांवर माझा माथा टेकवला अन त्यांच्याशी आभाराचे दोन शब्द बोलायला निघाले,पण तेवढ्यात...'ती' थोर प्रतिकृती अंधारात नाहीशी झाली होती...
-भक्ती चंद्रकांत पानसरे
Comments
Post a Comment