Skip to main content

थरार

                   नेहमीसारखाच आजही व्यायामशाळेतून यायला उशीर झाला होता .व्यायामशाळेत जाण्यासाठी आम्हाला रोज परळीचा घाट पार करून सातारला जावं लागतं ,अंतर तस फार नाही अकरा किलोमीटर आहे पण रस्ता मात्र घाटाचा अन डोंगररांगांनी वेढलेला ! रात्री अपरात्रीच्या वेळी मुलीनी इतका वेळ घराबाहेर थांबू नये म्हणून घरची मंडळी सतत ओरडतात, पण निशु ताई अन मी काही आमच्या व्यायामाच्या वेळेत हयगय करत नाही. आमच्या ठरलेल्या वेळेत च म्हणजे साडे नऊ च्या दरम्यान घरी येतो . आजही सगळा व्यायाम उरकून , आरशात बघत शरीरयष्टी चे भारदस्त फोटो काढले. फ्रेश होऊन गाडीला किक मारली अन घरी यायला निघालो. व्यायामाने थकलेल्या शरीराला खूप भूक लागली होती , घरी लवकर पोहोचून गरमागरम ताटावर ठाण मांडायला मिळावं म्हणून गाडीचा वेग मी वाढवला होता .

सुनसान अशा त्या आडबाजूच्या घाट रस्त्याला गाड्यांची वर्दळ फार नव्हती पण अंधारलेल्या समयी रातकिड्यांच्या कीर्र आवाजात भीतीदायक माहोल तयार झाला होता .वाटेत लागणाऱ्या उरमोडीच्या पुलाशेजारीच गावची स्मशानभूमी आहे .त्या पुलावरून जाताना एका सालात एक तरी बळी 'ती' घेतेच अशी दंतकथा ही प्रचलित आहे ,पण आमच्यासारखे विज्ञानाचे विद्यार्थी या दंतकथेला घाबरून रात्रीचा प्रवास करणे टाळू म्हणलं तर नवलंच ! कधीकधी डेरिंग दाखवण्यासाठी आयुष्यात असे प्रसंग यावेच लागतात याचा प्रत्ययच आज येताना आम्हाला आला .कारण ही काही तसच घडलं होत !
परळी गावच्या वेशीबाहेर सज्जनगड ची भली मोठी डोंगररांग उभी ठाकली आहे जणू या वसुमतीच्या तुकड्याने परळीला स्वतःच्या उदरात आश्रय दिला आहे .आजूबाजूचा भाग ,इथलं निसर्ग चक्र हे बरचस या डोंगरावर अवलंबून असत . या डोंगररांगेला वळसा घालून खाली उतरल की समोर उरमोडी धरणाची भली मोठी पसरलेली भिंत अन त्याखाली परळीच दर्शन घडतं . दक्षिणेला सज्जनगडच्या डोंगररांगेचा वेढा अन उत्तरेला तब्बल साठ गावांसाठी नेहमीच वरदायिनी ठरलेली 'उरमोडी' , असं हे माझं गाव ! परळी फाटा सोडून थोड्या अंतरावर आम्ही गेलो अन डोंगररांग पास करण्याच्या रस्त्याला लागलो . नेहमीचा रस्ता ,नेहमीची वेळ यामुळ रस्ता पाठ होता पण क्षणभरात अचंबित करणारी अन आयुष्यात पुस्तकी चित्रज्ञान सोडून खऱ्या धाडसाची परीक्षा देण्याची ती वेळ आली !खरंच ,तिसऱ्या वर्षाची "सत्र" परीक्षा पुस्तकी अभ्यास करून दिली पण आजची ही "सत्व" परीक्षा मृत्यूला गाठ घालून देणारी होती !
वळणाच्या अलीकडे गाडीचा वेग कमी होता तितक्यात गर्द झाडीच्या त्या डोंगरातून गाडीसमोर अचानक बिबट्या येऊन थबकला . क्षणात त्याची अन माझी नजरानजर झाली . त्याचे ते विलक्षण भावदर्शी डोळे , गाडीची हेड लाईट त्यावर पडल्याने प्रखरतेने अधिक क्रूर दिसत होते .अगदी काही सेकंदाचा तो अवधी ...! पिवळ्या रंगाचा तो उमदा , अंगावर काळ्या रंगाचे स्पॉट्स अन भारदस्त असा तो प्राणी म्हणजे पुस्तकातला "बिबट्या" पण आज तोच माझ्या समोर साक्षात समोर मृत्यू बनून आलेला . तो डाव्या बाजूने डोंगरातून गाडीवर झेप घेणार तोच काहीतरी हालचालीची भुणभुण लागल्याने मी वेग कमी केला होता म्हणून एक मीटरच्या अंतरावर ही नजरानजर झाली . गावाच्या या परिसरात शेतकऱ्यांना शेतात,लाकडे गोळा करणाऱ्याना जंगलात ,पहाटे फिरायला जाणाऱ्या मॉर्निंग वाँकर्स ना अशा प्रसंगांना बऱ्याचदा सामोरं जाव लागणाऱ्या कथा इकडून तिकडून गावच्या पारावर ऐकल्या होत्या पण बिबट्या समोर आला तर "मनोजवं मारुततुल्य वेगम" श्लोक म्हणायचा मग बिबट्या ही प्रत्युत्तरात"वदनी कवळ घेता" म्हणेल इतकाचा काय तो विनोदाचा भाग सोडून कधी आपल्याला या प्रसंगाला सामोरे जावे लागेल अन त्यासाठी संरक्षणपर विचार ही आजपर्यंत केला नव्हता पण आज त्या क्षणी विचार नाही तर गरज होती कृती करण्याची ! व्यायामशाळेतून भुकेजल्या पोटाने वेगात घरी निघालो होतो पण घरी जाण्याआधीच बिबट्याचं भक्ष्य बनायला आम्ही च त्याच्या ताटात मेजवानी बनणार होतो . सुख दुःख हेवे दावे हे सगळं काही क्षणात नाहीस झालं अन महत्वाचा वाटला तो जीव . हिंमत दाखवण्याची ही एकदा वेळ टळून गेली तर माझ्या जीवाला मी मुकणार होते. जिवाच्या आकांताने जीव वाचवण्याची माझी धडपड माझ्या नजरेतून तरळत होती. इतक्यात हार मानली तर माझ्या नावासमोर जन्मभराचा वाघाची शिकार झाल्याचा ठप्पा बसला असता, माझं जगून झालंय अस मी गृहीत धरलं आता माझं मरण माझ्या हातात आहे ते भिऊन घ्यायचं की दिमाखात त्याला सामोरे जायचं हे मला ठरवायचं होत. शिवकन्या, रणरागिणी अशा फक्त उपमा नावासमोर लावून घेणारी मी मराठी मुलगी नव्हे खऱ्याखुऱ्या वाघासमोर लढायचं म्हणजे त्याच्याच ताकतीच वाघिणीचं काळीज बनून लढायचं मी ठरवलं त्या सेकंदाच्या काही क्षणातच ! गाडीची ती बिबट्याच्या डोळ्यात पडणारी क्रूर वाटणारी हेड लाईट समोर ...मी.... अस ते समरांगण अन प्रेक्षक म्हणून आजूबाजूचा भयाण काळोख ...!
निसर्गाच्या नियमातच फक्त प्रतिकार करण्याऱ्याला अस्तित्व आहे .भविष्यात तोच टिकतो जो नाहीसे करायला आलेल्या परिस्थितीला शरण न जाता त्याच्याशी दोन हात करतो.आता मेले तरी बेहत्तर पण मरताना माझी कोणत्या प्राण्याने शिकार केलीये अन म्हणून विव्हळत माझा जीव जाणार हे अस मरण मला कधीही पसंद नव्हतं म्हणून मी लढायचं ठरवलं ... क्षणात बिबट्या हल्ल्यासाठी पुढे सरसावला , बिबट्याला प्रतिकार करण्याची माझ्या नजरेतली ती आग अन धडधडत्या उरातील हिम्मत घेऊन मी ही मागे हटले नाही . माझा तो रौद्रअवतार पाहून क्षणार्धात बिबट्याने त्याचा मार्ग वळवला अन उरमोडीच्या दिशेने गेला. पाठीमागून आलेल्या दोन चार गाड्यांची गर्दी जमत होती. आम्ही घरी येईपर्यंत बिबट्याच्या भेटीची ही वार्ता गावात पोहोचली होती ,कौतुकाने सगळ्यांनी माझी प्रशंसा केली ,आईने नजर उतरवली अन काही वेळात ही खबर पंचक्रोशीत पसरली . बिबट्याला भेटून त्याच्याशी नजरानजर करू शकले या आनंदाचा तो उत्सव नव्हता.ती एक प्रकारची अंमलबजावणी होती ...पुस्तकात शिकलेल्या धैर्याला पुस्तकातच मर्यादित ठेवायचं की प्रत्यक्षात असे प्रसंग आल्यावर 'शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात' म्हणून तिथून पळ काढायचा ? अन मी ती पार पाडली होती. ...!

- भक्ती चंद्रकांत पानसरे

Comments

  1. अस्सल मराठी वाघीण... व्वा ग व्वा.... अशाच आई जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाई घरा घरात हव्यात.

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर लिखाण करतेस,भक्ती

    ReplyDelete
  3. So nice no word about your handling of the situation l am proud of you well done

    ReplyDelete
  4. बापरे....खूप सुंदर लिखाण..घरी येताना काळजी घ्या..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

काकस्पर्श

  मराठी चित्रपटांना cringe म्हणणाऱ्यांवर जबरदस्त चपराक मारणारा हा चित्रपट ! जसं की चित्रपटाच्या नावातच आहे काकस्पर्श ,नावावरून एक प्रचिती येते त्याप्रमाणे हिंदू धर्मात पिंडदानात दशक्रियेविधी दरम्यान कावळ्याच्या भूमिकेला जे महत्व आहे त्याचा संदर्भ असलेला हा चित्रपट आहे पण चित्रपट बघताना अगदी शेवटी महादेवच्या पिंडदाना वेळी झालेला काकस्पर्शाचा प्रसंग उमेचं पूर्ण आयुष्य दुःखाच्या खाईत कशा प्रकारे लोटून देतो सोबतच स्वातंत्र्य पूर्व काळात विधवा निराधार स्त्रियांची ,सन्मान सोडाच पण फक्त जगण्यासाठी झालेली ससेहोलपट या चित्रपटात जबरदस्त स्पष्ट रेखाटली आहे . चित्रपट पाहताना खरंच प्रश्न पडतो की आज स्त्रियांना समाजात समाजाकडून जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्याचा इतिहास किती भयंकर आहे . अगदी 14-15 व्या वर्षी विधवा झालेली उमा , संपूर्ण आयुष्य न मिळालेल्या लैगिंक सुखाची अनुभीती नेमकी कशी असते ही भावना घेऊन शेवटी मरून जाते. स्त्रीच्या आयुष्यात नवरा नसेल तर तीच जगणं समाजाने किती हराम करून टाकलं होतं या उमेच्या भूमिकेला अभिनेत्री प्रिया बापट ने पूर्ण न्याय दिला आहे. पूर्वीच्या काळीच्या रितींनुस...

काहूर

                                                                                           अंधारलेली काळरात्र... सन्नाटा करणारा आवाज... गर्द झाडीतून ...रस्त्यावरून दमकणार्‍या काजव्यांचं लुकलुकणारं ते रूप... निरभ्र आकाशात शापित चांदण्यांचं राज्य, सूर्याचं साम्राज्य अस्त पावलं म्हणून जणू काही राजा चांदोबाच्या महालात वर्चस्व दाखवणाऱ्या दीड-दमडीच्या 'या' कुशलतेने पृथ्वीवर देखरेखच ठेवत होत्या ... असा हा सगळा प्रसंग असताना ,मी मात्र एक कवी ...काय बरं प्रासंगिक  कविता करणार या सगळ्यावर ?ऐन तारुण्यात बहरलेल्या यौवणावर प्रणयकाळाच्या कविता खरतर सुचायला हव्या होत्या, पण माझ्या मनात  एक भलतीच हुरहुर लागलेली लागलेली होती.निरभ्र आकाशातल्या या चांदण्या पाहून खरंतर प्रेम कविता करण्याचा मोह आज पर्यंत मला कधीच आवरला नाही पण आज... आज माझी मजल यांना शापीत म्हणण्यापर...